Avatar Din भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांचा भाद्रपद शुध्द द्वितीया हा दिवस “अवतार दिन” म्हणून साजरा करण्याबाबतची कार्यपद्धती परिपत्रक भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांची शिकवण व प्रबोधनपर माहिती

Avatar Din

Avatar Din

bhagwan sarvadnya shrichakradhar swami yancha bhadrapad shuddh dwitiya ha divas “avatar din” mhanun sajara karnyababatchi karyapaddhatee

Procedures for celebrating Bhadrapada Shudddha Dwitiya as “Avatar Din” by Bhagwan Sarvajna Sri Chakradhar Swami

भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांचा भाद्रपद शुध्द द्वितीया हा दिवस “अवतार दिन” म्हणून साजरा करण्याबाबतची कार्यपद्धती.

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग

शासन परिपत्रक क्रमांक. जपूती २०२५/प्र.क्र. १९५/ कार्या- जपुक (२९), मंत्रालय, मुंबई

दिनांक: ०२/०९/२०२६

पहाः १) शासन परिपत्रक क्रमांक. GAD-४९०२२/१०/२०२५-GAD (DESK-२९), दि. २९.०४.२०२५ व शासन परिपत्रक क्र. जपुती-२०२५/प्र.क्र.१९५/कार्या-जपुक (२९), दि.२३.०४.२०२६.

२) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. GAD-४९०२२/५/२०२५-GAD (Desk-२९), दि.११.१२.२०२५.

परिपत्रक

महानुभाव पंथ प्रवर्तक भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींनी १२ व्या शतकात सत्य, अहिंसा, मानवता, समानता हे जागतिक मूल्ये समाजाला दिली. भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचे तत्त्वज्ञान, मानवतावादी कार्य, अलौकिक मराठी साहित्य याद्वारे सामाजिक उन्नतीसाठी योगदान दिले आहे. भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांच्या कार्याचा गौरव म्हणून भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांचा भाद्रपद शुध्द द्वितीया हा दिवस “अवतार दिन” तिथीनुसार साजरा करण्याबाबत मंत्रालय व सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयांना संदर्भाधीन क्र. १ येथील दिनांक २९.०४.२०२५ व दि.२३.०४.२०२६ रोजीच्या शासन परिपत्रकांन्वये कळविण्यात आले आहे. सदरचा “अवतार दिन” साजरा करताना कोणते कार्यक्रम आयोजित करावेत, याबाबत स्वतंत्ररित्या सूचना निर्गमित करण्यात येतील, असे सदर शासन परिपत्रकामध्ये नमुद करण्यात आले होते. त्यास अनुसरून संदर्भाधीन क्र.२ येथील शासन निर्णय दि.११.१२.२०२५ अन्वये महानुभाव पंथातील महंतांची समिती गठीत करण्यात आली होती. २. सदर समितीच्या अहवालातील शिफारशींच्या आधारे भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांचा भाद्रपद शुध्द द्वितीया हा दिवस “अवतार दिन” खालीलप्रमाणे आयोजित करण्यात यावा.:-

१) भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांच्या भाद्रपद शुध्द द्वितीया ह्या अवतार दिनाच्या कार्यक्रमाचे स्वरुप “भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामींच्या विचारांवर प्रबोधन व त्यांच्या सामाजिक समता, अहिंसा अशा कार्याविषयी माहिती देणे” अशा स्वरुपाचा राहील. त्यांचा अवतार दिन साजरा करताना त्यांच्या कार्याविषयी सोबत जोडलेल्या परिशिष्ट १ मधील माहितीचे वाचन करण्यात यावे.

२) कार्यक्रमाचे आयोजन संबंधित कार्यालय प्रमुख यांच्या स्तरावर करण्यात यावे.

३) कार्यक्रमाचे आयोजन उपलब्ध आर्थिक तरतूदीतून करण्यात यावे. उपलब्ध कार्यालयीन साधनसामग्रीतून सदर कार्यक्रम आयोजित करण्यात यावा.

४) भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतारदिनाचा कार्यक्रम आयोजित करताना शक्य झाल्यास संबंधित जिल्हा प्रशासनाने स्थानिक महानुभाव पंथीय साधक, प्रतिनिधी व अभ्यासक यांच्याशी समन्वय साधून त्यांच्या सहभागाने कार्यक्रमाचे आयोजन करावे. कार्यक्रमामध्ये कोणत्याही प्रकारचे धार्मिक विधी किंवा सक्तीचा सहभाग ठेवण्यात येऊ नये.

५) कार्यक्रमाचा उद्देश भगवान श्री चक्रधर स्वामी यांच्या सामाजिक समता, अहिंसा व नैतिक विचारांचा परिचय करून देणे असा असावा.

३. विभागीय आयुक्त / जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या विभागातील / जिल्हयातील सर्व शासकीय /निमशासकीय कार्यालयात सदर कार्यक्रम आयोजित करण्याबाबत आवश्यक त्या सूचना निर्गमित करुन त्यांच्या अंमलबजावणीबाबत योग्य ती कार्यवाही करावी.

तसेच सदर शासन परिपत्रक सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयाबरोबरच राज्यातील सर्व महाविद्यालये व सर्व शाळा यांनाही लागू राहील.

४. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२६०९०२१८४२२८७८०७ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

       परिशिष्ट १

भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांची शिकवण व प्रबोधनपर माहिती

१२ व्या शतकात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक जीवनात महत्त्वपूर्ण परिवर्तन घडवून आणणारे महानुभाव पंथाचे प्रवर्तक भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी हे थोर समाजसुधारक व तत्त्वज्ञ होते. त्यांचा जन्म गुजरातमधील भडोच (भरूच) नगरी येथे विशाळदेव व माल्हणदेवी यांच्या पोटी झाला. त्यांनी तत्कालीन समाजातील जातिभेद, अंधश्रद्धा, कर्मकांड व सामाजिक विषमता यांना विरोध करून मानवतेवर आधारित विचारांचा प्रसार केला.

श्रीचक्रधर स्वामींनी महाराष्ट्राला आपली कर्मभूमी मानून धर्म, समाज व अध्यात्म क्षेत्रात मोलाचे कार्य केले. त्यांनी स्त्री-पुरुष समानता, सर्वांना शिक्षणाचा अधिकार, अहिंसा, दया, सत्य, परोपकार आणि सामाजिक समरसता यांचा संदेश दिला. त्यांच्या शिकवणीतून माणसाने सदाचार, विवेक आणि मानवकल्याणाचा मार्ग स्वीकारावा, असा संदेश मिळतो.

श्रीचक्रधर स्वामींनी विविध भागात भ्रमण करून समाजप्रबोधन केले. त्यांच्या विचारांचा प्रभाव महाराष्ट्राच्या लोकजीवनावर मोठ्या प्रमाणात पडला. त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार केला व महानुभाव साहित्याची समृद्ध परंपरा निर्माण केली. “लीळाचरित्र” हा मराठीतील आद्य चरित्रग्रंथ त्यांच्या कार्याचा महत्त्वपूर्ण वारसा मानला जातो. महानुभाव साहित्याने मराठीच्या अभिजात भाषेच्या मान्यतेत महत्वपुर्ण योगदान दिले.

भगवान श्रीचक्रधर स्वामींचे जीवन हे मानवता, समानता आणि ज्ञानाचा संदेश देणारे आहे. भाद्रपद शुद्ध द्वितीया हा त्यांचा अवतारदिन म्हणून श्रद्धेने साजरा केला जातो. त्यांच्या विचारांचे स्मरण करून समाजात नैतिक मूल्ये, बंधुभाव आणि सामाजिक ऐक्य वाढविणे हीच त्यांना खरी आदरांजली. भाद्रपद शुद्ध द्वितीया ह्या त्यांचा अवतारदिनानिमित्त त्यांच्या महान कार्यास विनम्र अभिवादन.

Leave a Comment

error: Content is protected !!